बेळगाव : दलित विरोधी मागासवर्गीय कल्याण खात्याच्या जिल्हाधिकारी शिवप्रिया कडेजोर आणि सुळगा (उ) येथील इंदिरा गांधी निवासी शाळेचे प्राचार्य व वॉर्डन यांना तात्काळ निलंबित करून त्यांची बदली अन्यत्र केली जावी या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्या एसटी शाखेचा जिल्हाध्यक्ष भरमू कुर्ली आणि संस्थापक राज्याध्यक्ष लक्ष्मण दशरथ कोरकर यांच्या नेतृत्वाखाली सदर उपोषण केले जात आहे. या आंदोलनामध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे सागर कोलकार, नागेश कोलकार, मल्लाप्पा कोटेगार, किना कांबळे, भीमसी कोलकार, अडीयाप्पा कोलकार, आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या आंदोलनकर्त्यांनी दलित विरोधी मागासवर्ग कल्याण खात्याच्या जिल्हाधिकारी शिवप्रिया कडेजोर या स्वतःच्या गैरवर्तनातून आपल्या खात्याला काळीमा फासत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भरमू कुर्ली आणि लक्ष्मण कोलकार हे गेल्या 1 जानेवारी 2024 रोजी सुळगा येथील इंदिरा गांधी निवासी शाळेच्या गैरकारभारासंदर्भात भेटण्यास गेले असता. मागासवर्ग कल्याण खात्याच्या जिल्हाधिकारी शिवप्रिया कडेजोर यांनी आपल्या वर्तनातून त्यांची जातीनिंदा करून त्यांचा अवमान केला आहे. त्यासाठी शिवप्रिया कडेजोर यांच्यासह सुळगा (उ) येथील इंदिरा गांधी निवासी शाळेचे प्राचार्य व वॉर्डन यांना तात्काळ निलंबित करून त्यांची बदली अन्यत्र केली जावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष लक्ष्मण कोलकार म्हणाले की, सुळगा (उ) येथील इंदिरा गांधी निवासी शाळेतील गैरव्यवस्था आणि मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केले होते. त्या अनुषंगाने मी आणि भरमू कुर्ली मागासवर्ग कल्याण खात्याच्या जिल्हाधिकारी शिवप्रिया कडेजोर यांना भेटण्यास गेलो होतो. त्यावेळी आम्ही एससी -एसटी नेते असल्याचे सांगताच जिल्हाधिकारी कडेजोर यांनी आम्हाला थोडं दूर उभारून बोला असे बजावून आम्हाला हीन वागणूक दिली. या पद्धतीने आम्हा दलित नेत्यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी शिवप्रिया कडेजोर यांना निलंबित करून त्यांची अन्यत्र बदली केली जावी. त्याचप्रमाणे सुळगा येथील इंदिरा गांधी निवासी शाळेचे प्राचार्य आणि वॉर्डन यांना देखील निलंबित करून त्यांची अन्यत्र बदली केली जावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच आम्ही आजपासून हे आमरण उपोषण सुरू केले आहे, असे लक्ष्मण कोलकार यांनी सांगितले.