सांगली : सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कृष्णानदीसह वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वारणा नदीवरील काखे-मांगले, कुंडलवाडी पूलासह अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरण क्षेत्रात चोवीस तासात ६६ मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात २३.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. १ हजार ३९६ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली आहे. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे.
कृष्णा खोऱ्यातील पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा १.९ टीएमसीने कमी करून शनिवारी ९७ टीएमसी ठेवला आहे. धरणात सध्या ७९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.