
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला असून महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ठोस व दीर्घकालीन योजना या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसत नाहीत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे.
केवळ घोषणा आणि गॅरंटी योजनांवर भर देत राज्यावर कर्जाचा वाढता बोजा टाकण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो. उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी या अर्थसंकल्पात अभावाने दिसते.
विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी महिलांच्या उद्योग, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी उपाययोजना या अर्थसंकल्पात पुरेशा प्रमाणात दिसत नाहीत.
राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि महिलांना व युवकांना सक्षम करणारा अर्थसंकल्प जनतेला अपेक्षित होता. मात्र हा अर्थसंकल्प त्या अपेक्षांवर पूर्णपणे खरा उतरलेला नाही असे नमूद करून जनहित, विकास आणि आर्थिक शिस्त जपणारा अर्थसंकल्प व्हावा यासाठी आम्ही नेहमीच आवाज उठवत राहू असे भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta