बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) या सर्वात कठीण परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. कलखांब गावचा सुपुत्र राहुल जयवंत पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 224 वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. राहुल पाटील यांनी 2004 साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत देखील 804 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले होते त्यावेळी त्याला इंडियन फॉरेस्ट सर्विस मिळाली होती त्याने आसाम येथे याबाबतचे प्रशिक्षण देखील घेतले होते. मात्र राहुलने त्याच्या या यशावर समाधान न मानता पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याने पुन्हा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या प्रयत्नांना यश म्हणून यावेळी त्याला 224 वा मिळाला. राहुलचा जन्म हा सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आई, वडील शेतकरी तसेच वडिलांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय देखील आहे. कुटुंबीयांचा शिक्षणाशी तसा फारसा संबंध नव्हता तरीदेखील राहुलचे यूपीएससी परीक्षा देण्याचे ध्येय होते. या ध्येयाने पछाडलेल्या राहुलने प्रामाणिकता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 224 वा क्रमांक घेत गरुड झेप घेतली. राहुलचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बेळगाव येथील वनिता विद्यालय इंग्लिश माध्यम शाळेत झाले. त्यानंतर आरएलएस महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गुणवत्तेच्या जोरावर त्याला बेंगळूर येथील आर व्ही कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर त्याने बीईपर्यंतचे शिक्षण बेंगळूर येथे पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुलने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. राहुलचा प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण इतिहासाच्या जोरावर त्याने दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत गरुड झेप घेतली आहे. राहुलचे यश हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी प्रेरणा देईल ठरले. त्याच्या या यशाबद्दल कलखांब ग्रामस्थांसह बेळगाव परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta