बेळगाव : येथील सहावे जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणातील पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश ओ. शिवपुत्र दिंडलकोप यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देताना पुराव्यांतील व विशेषतः मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीचा आधार घेत निर्णय दिला.
या प्रकरणातील आरोपी जी. मंजु बाळराव देसाई (प्रभुनगर, खानापूर), अमोल परशराम परती, सुरज मोहन गोरल, सुहास व्यंकटेश गोळेकर (तिघेही निंगापूर गल्ली, खानापूर) तसेच सतीश शिवाजी सावंत (दुर्गानगर, खानापूर) यांच्यावर शैला सनदी उर्फ देसाई हिचा जाळून खून केल्याचा आरोप होता. मात्र न्यायालयाने सर्वांना निर्दोष घोषित केले.
घटनेनुसार, 28 नोव्हेंबर 2020 रोजी शैला सनदी आपल्या घरी असताना आरोपी तिच्या घरी गेले होते. शैला हिचा प्रियकर प्रितेश देसाई याचा यापूर्वी 27 जानेवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यासंदर्भातील कागदपत्रांवरून वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. या वादातून आरोपींनी शैलाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळल्याचा आरोप होता.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत शैला सनदी हिने बेळगाव जिल्हा रुग्णालयात तहसीलदार व पोलिसांसमोर मृत्यु पूर्व जबानी दिली होती. मात्र या जबानीत आढळलेल्या विसंगतींमुळे न्यायालयाने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे शक्य नसल्याचे नमूद केले.
या आधारे खानापूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 302, 504 आणि 506 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, आरोपींच्या बाजूने अॅड. प्रताप यादव, अॅड. हेमराज बेंचनावर, अॅड. स्वप्निल नाईक आणि अॅड. निकिता घाटगे यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta