
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अतिवाड गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकारी भेटले नाहीत, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
बेळगाव तालुक्यातील अतिवाड गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांसह जनावरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आज ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले होते. मात्र, दोन दिवस आधीच सूचना देऊनही पंचायत सचिव आणि संबंधित अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने शेतकऱ्यांचा पारा चढला. जबाबदार पदावर असूनही अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या बेजबाबदारपणाचा शेतकरी नेत्यांनी तीव्र निषेध केला.गावात तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रमुख यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta