
बेळगाव : तुरमुरी येथील बेळगाव महापालिकेचा कचरा डेपो त्वरित बंद करून स्थलांतरित करावा, या मागणीसाठी आज तुरमुरी ग्रामस्थांनी बेळगावमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात अनोखा मोर्चा काढला. हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांपासून शहरातील कचरा गावात टाकला जात असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून श्वास घेणेही कठीण झाले आहे. तसेच कुत्र्यांचा उपद्रव वाढून हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. सांडपाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान होत असून भूजलही दूषित झाले आहे. यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करताना, कचरा डेपोमुळे त्वचारोगांसारखे आजार वाढत असल्याचे सांगितले. जनवस्तीत डेपो उभारून प्रशासनाने अन्याय केल्याचा आरोप करत, डेपो तात्काळ बंद न केल्यास लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा, असा इशारा देण्यात आला.
दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. कचरा डेपो स्थलांतरासाठी पर्यायी जागेचा शोध घेणे आवश्यक असून त्यासाठी काही कालावधी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत तेथील काम तात्काळ थांबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनात तुरमुरी गावातील महिला, वृद्ध आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta