उचगाव : आपल्या रोजच्या धावपळीतून मोकळा वेळ काढत एक दिवस जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित श्री मळेकरणी हायस्कूलमधील सण 1990-91या वर्षांमधील दहावीच्या वर्गातील, बॅचचा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साही वातावरणात पार पडला. या स्नेहमेळाव्याला सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात, सोबत देत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी शिक्षकांचे स्वागत व सन्मान करत शिक्षका प्रती असलेला आदर आणि प्रेम इतक्या वर्षांनंतरही कायम आहे हे त्यांनी दाखवून दिले. तसेच यापुढेही प्रत्येक वर्ग मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होत एक आदर्शवत वाटचाल राहील, त्याचबरोबर भागातील एखादा विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सढळ हस्ते मदत केली जाईल असा निर्धार या स्नेहमेळाव्या प्रसंगी या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्याला निवृत्त मुख्याध्यापक एस. बी. मरूचे, आजिव मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले, निवृत्त शिक्षक बी. बी. शिंदे, डी. एस. मुतकेकर, बी. एस. पाटील, एल. वाय. कावळे, एम. एम. तिगडी, वसुंधरा आजगावकर, जी. के. तुप्पट उपस्थित होते. या सर्व गुरुजनांचा मानाचा भगवा फेटा बांधून, शाल घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर सर्व उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव शिक्षकांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत सुनील पावशे या विद्यार्थ्याने करून दिले. यावेळी उपस्थित गुरुजनांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी तुकाराम वेताळ, मोनाप्पा पाटील, परशराम मरूचे, उदय देसाई, बाळू कोवाडकर, रामदास चौगुले, सुनिता देसाई , रोहिदास हांडे, अनिता लाळगे, मंगल पाटील या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेतील जुन्या आठवणी उजाळा देणारे विचार मांडले.
तसेच शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यावरील वचक, क्रीडा स्पर्धा मधील सातत्याने असलेली विजयाची परंपरा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी भाषणे केली.
प्रारंभी सर्व गुरुजनांचे स्वागत विद्यार्थिनींनी औक्षण करून व मार्गामध्ये फुलांचा वर्षाव करत कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. आणि फीत कापून या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण वेताळ यांनी केले तर सुनील पावशे यांनी आभार मानले.