बेळगाव : बेळगाव सुवर्णसौध समोर शेवया सुकविण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली असून माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णसौध समोर तेथील कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचारी महिलेने शेवया सुकविण्यासाठी घातल्या होत्या. हा प्रकार संपूर्ण राज्यासाठी अवमानकारक असल्याचे सांगत या प्रकारासाठी अधिकारी आणि पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भीमाप्पा गडाद यांनी केली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांसोबत एका व्हिडिओच्या माध्यमातून भीमाप्पा गडाद यांनी संवाद साधला असून हा प्रकार संपूर्ण राज्यासाठी अवमानकारक असल्याचे म्हटले आहे. ४०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुवर्णसौधमध्ये अनेक पोलीस, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु तरीही अशी घटना घडणे हि लाजिरवाणी बाब असून त्या महिलेला आत कुणी सोडले? याला कारणीभूत कोण आहे? त्याठिकाणी कोण सेवा बजावत होते? मुख्य प्रवेशद्वाराकडे कोणाला जबाबदारी देण्यात आली होती? याचा तपास घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भीमाप्पा गडाद पुढे म्हणाले, सुवर्णसौधमध्ये किती कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे? याठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेली माहिती मिळविण्यासाठी अर्ज केला असून यात पोलीस विभाग किंवा प्रशासनाचा संबंध आढळ्यास न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
Check Also
काळ्या दिनाला परवानगी देऊ नये : कन्नड संघटनांची कोल्हेकुई
Spread the love बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनासाठी कोणत्याही कारणास्तव परवानगी …