जायंट्स सखीने केलं कंग्राळीतील त्या वाके कुटुंबाचे सांत्वन
बेळगाव : गेल्या आठवड्यात तालुक्यातील बीके कंग्राळी या गावामधील वाके कुटुंबातील झालेल्या वादावादीत दिपक वाकेचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुले जखमी झाली.
पत्नीच्या माहेरी जाऊन सासु तसेच मुला-मुलीवर चाकूहल्ला करण्यासह घरातील साहित्याची तोडफोड व जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या झटापटीत जावयाचा मृत्यु झाला.
दीपक वाके हा पत्नी दीपाच्या नेताजी गल्ली कंग्राळी बुद्रुक येथील माहेरी गेला होता. त्यावेळी त्याने सासू यल्लुभाई हुरुडे यांच्याबरोबर वाद घालून आपला मुलगा दिनेश आणि मुलगी दिया यांच्यावर चाकू हल्ला केला. त्याच बरोबर घरातील टीव्ही देखील फोडला. त्यानंतर घरातील अंथरूण देखील पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
अशा परिस्थितीत त्या कुटुंबातील जखमी सदस्यांना धीर देण्यासाठी जायंट्स सखीच्या पदाधिकाऱ्यांनी कंग्राळीमध्ये त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली.
दीपा वाके यांची परिस्थिती खूपच हलाखीची असून मोलमजुरी करून त्या आपल्या मुलांचे पालनपोषण करीत होत्या.
अशातच या घटनेमुळे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या कुटुंबाला मानसिक आधार देऊन त्यांना दोन ते तीन महिने पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप करण्यात आले. साधारण बारा हजार रुपयांपर्यंतच्या या संचामध्ये तांदूळ, जोंधळे, गव्हाचे पीठ, तूरडाळ, मुगडाळ, हरबरा डाळ, साखर, गुळ, मूग, मिरची पावडर, हळद, चहा पावडर, खाण्याचे तेल, मसाला, डिटर्जंट पावडर, आंघोळीचा साबण आदी वस्तूंचा या जीवनावश्यक संचमध्ये समावेश असून त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्यही देण्यात आले.
जिथे जिथे महिला आणि मुलींना आधाराची गरज असते तिथे तिथे जायंट्स सखी नेहमीच पुढाकार घेत असतात.
या कंग्राळीतील घटनेनंतर सामाजिक उत्तरदायित्वाने ‘माणूसकीचं नातं’ जोपासण्याचे काम जायंट्स सखीने केले आहे.
अध्यक्षा चंद्रा चोपडे, माजी अध्यक्षा निता पाटील, संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, अर्पणा पाटील, सचिव सुलक्षणा शिनोळकर, शितल नेसरीकर, अर्चना पाटील, वृषाली मोरे, अर्चना कंग्राळकर, वैशाली भातकांडे, शिला खटावकर, सीमा वर्णेकर, लता कंग्राळकर, सुलोचना कुट्रे, ज्योती सांगुकर, शितल पाटील, गौरी गोठीवरेकर, राजश्री हसबे यांच्या आर्थिक सहकार्यातून ही मदत करण्यात आली.