बेळगाव : स्मार्ट सिटी बेळगाव शहरातील जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. वीरभद्रनगर येथील जलवाहिनीला गळती लागल्याने कारंज्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. मात्र सध्या ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रमाणही वाढले आहे.
स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई करताना जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याने गळती लागत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. शिवाजीनगर, वीरभद्रनगर परिसराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती लागली. अचानक लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे फवारे उडू लागले. नागरिकांनी पाहणी केली असता जलवाहिनीचे नुकसान झाल्यामुळे पाण्याचे फवारे उडत असल्याचे आढळले. गळतीनंतर तासभर पाण्याचे फवारे उडतच होते.
