
महात्मा गांधी 154 वी जयंती साजरी
बेळगाव : महात्मा गांधी हे अहिंसेच्या तत्त्वाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान आत्मा होते. त्यामुळेच संपूर्ण जग त्यांचा आदर करते. रक्तक्रांतीशिवाय कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची उदाहरणे नाहीत. मात्र गांधीजींनी दाखवून दिले आहे की, अहिंसेच्या माध्यमातून शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो आणि आपण सर्वांनी त्यांचे आदर्श व तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन बेळगावच्या खासदार मंगला आंगडी यांनी बोलताना केले.
टिळकवाडी येथील वीरसौध येथे आज रविवारी सकाळी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार मंगला आंगडी यांसह उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
यावेळी पुढे बोलताना खास. अंगडी म्हणाल्या, प्रत्येकाने महात्मा गांधींच्या आदर्श मूल्यांचे जीवनात पालन केले पाहिजे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हेही महान देशभक्त होते. त्यांनीही आपले आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले. आपण सर्वांनी गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या मूल्यांवर चालण्याचा प्रयत्न करूया.
त्यांच्या शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला केवळ बळ दिले नाही तर लाखो लोकांची मने जिंकली. त्यांची विचारधारा आजही समर्पक असल्याचे खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून गांधी जयंती साजरी करण्यात आली.त्यानंतर खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र करलिंगनवर, महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांचा स्वातंत्र्यसैनिक वारसदार संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरनाथ कडबुर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी यांनी सर्वांचे स्वागत केले. संगीत शिक्षक मोरे व सहकार्यांनी यावेळी गांधी प्रिय भजन सादर केले.
Belgaum Varta Belgaum Varta