बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या निषेधार्थ भव्य सायकल फेरी व निषेध फेरीतून मराठीची ताकत दाखवून दिली.
हजारोंच्या संख्येने सीमा बांधव, समितीच्या रणरागिणी या निषेध फेरीत सहभागी झाल्या होत्या.
1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर प्रांतात विलीन करण्यात आला. तेव्हापासून मराठी भाषिक 1 नोव्हेंबर हा काळा दिन सुतक दिन म्हणून पाळतात. बेळगावसह तालुक्यात काळादिन गांभीर्याने पाळण्यात आला. तालुक्यातील समितीप्रेमी मराठी भाषिक नागरिक उत्स्फूर्तपणे संभाजी उद्यानात दाखल झाले. या निषेध फेरीला महाराष्ट्रातून नेते सहभागी होणार होते. मात्र कर्नाटक प्रशासनाने कोगनोळी येथे त्यांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे ते या निषेध फेरीत ते सहभागी होऊ शकले नाहीत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन आसमंत दुमदुमून सोडला होता. निषेध फेरीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला.
मध्यवर्ती म. ए. समिती, शिवसेना, तालुका युवा आघाडी, महिला आघाडी यासह विविध युवक मंडळांनी निषेध फेरीत आपला सहभाग दर्शविला.
सकाळी 9 वाजता संभाजी उद्यानातून निषेध फेरीला सुरूवात झाली. शहराच्या विविध भागातून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता करण्यात आली.
या निषेध फेरीमध्ये समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडूसकर, तालुका युवा आघाडीचे संतोष मंडलिक, आर. एम. चौगुले, ऍड. महेश बिर्जे, ऍड. सुधीर चव्हाण, महेश जुवेकर, दत्ता उघाडे, चंद्रकांत कोंडूसकर, मदन बामणे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, माजी महापौर सरिता पाटील, सरस्वती पाटील, साधना पाटील, शिवानी पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, सुधा भातकांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.