Wednesday , March 4 2026
Breaking News

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे व्यासपीठ म्हणजे साहित्य संमेलन होय : ॲड. शाम पाटील

Spread the love

 

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मूहुर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम परमेश्वर नगर येळ्ळूर येथील मराठी मुलांची शाळा येळ्लूर वाडी शाळेच्या पटांगणावर झाला. 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक अमर यल्लाप्पा अकणोजी व त्यांच्या पत्नी सौ. अमृता अमर अकणोजी यांच्या हस्ते रोवण्यात आली. यानंतर श्री शिवाजी विद्यालयाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून बेळगावचे प्रसिद्ध ॲड. शाम पाटील हे होते. यावेळी बोलताना ॲड. शाम पाटील म्हणाले, येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षापासून अविरतपणे मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. खरे तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याच व्यासपीठ म्हणजेच साहित्य संमेलन होय. साहित्यामुळे माणसाच्या बुद्धीला चालना व प्रेरणा मिळते आणि त्यातून माणूस स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण दररोजच्या व्यवहारात प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे साहित्य संमेलनामुळेच आपली संस्कृती जपली जात आहे अशी साहित्य संमेलने मराठी माणसासाठी म्हणजे मराठी माणसाची ही नाळ आहे. येळ्ळूर गाव हे पुरोगामी विचारांच्या जडणघडणीत वाढलेले गाव आहे, या गावातील सर्वच कार्यक्रम पुरोगामी विचारावर आधारित होत असतात. महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे पुरोगामी विचार विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजविले पाहिजेत, मराठी भाषा खूप समृद्ध आहे, त्या भाषेचे जतन करणे हे तुम्हा आम्हा सर्वांचे आद्य कर्तव्यच आहे, मराठीला आम्ही आईप्रमाणे जपतो व मानतो. सीमा भागात होणारी साहित्य संमेलने ही मराठी भाषा, मराठी संस्कृती, रूढी- परंपरा टिकवून ठेवण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहेत, असे विचार ॲड. शाम पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना मांडले.

यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुनराव गोरल म्हणाले, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने अविरतपणे 17 वर्षे हे संमेलन चालू आहे, खरोखरच ही एक कौतुकास्पद बाब आहे, विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे, वाचन केला तरच तुम्ही भविष्यात वाचणार आहात विद्यार्थीदशेपासूनच वाचनाची सवय तुम्ही ठेवा तरच तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना घडवित असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी धडपडलं पाहिजे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृती व आपल्या पूर्वापार परंपरा टिकविल्या जात आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. व्यासपीठावर उद्योजक अमर अकनोजी त्यांच्या पत्नी अमृता अकनोजी, नियोजित 18 व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य रावजी महादेव पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुनराव गोरल, चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय. एन. मजूकर, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तानाजी हलगेकर, मुख्याध्यापक अरुण धामणेकर, मुख्याध्यापिका शोभा निलजकर आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री शिवाजी विद्यालयाच्या मुलींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुनराव गोरल यांनी सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन केले, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी सरस्वती देवीचे पूजन केले. नियोजित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष रावजी महादेव पाटील यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रास्ताविक व स्वागत साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी केले, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे साहित्य संघाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अमर अकणोजी व त्यांची पत्नी अमृता अकणोजी या दाम्पत्यांचा साडी -चोळी देऊन सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर प्रमुख वक्ते ॲड. शाम पाटील यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योजक अमर अकणोजी व कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला येळ्ळूर विभाग म.ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, कार्याध्यक्ष दुधापा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, नवहिंद सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, सन्मित्र सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील, डॉ. सतीश पाटील, प्रसाद वाय मजूकर, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश धामणेकर, ब्रह्मलिंग सोसायटीचे संस्थापक गोविंद कालसेकर, साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, सचिव डॉ. तानाजी पावले, परशराम बिजगरकर, सुभाष मजूकर, कृष्णा टक्केकर, पप्पू धूळजी, अमोल जाधव, संजय मजूकर विद्या पाटील, रेखा पाटील, एस. पी. मेलगे, एच. एस. लोकळूचे, एस. वाय. धामणेकर, निर्मला कंग्राळकर, महादेव घाडी, नारायण नंदीहळ्ळी यांच्यासह श्री शिवाजी विद्यालयचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी केले, तर आभार साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यानी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *