बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने संपूर्ण राज्यातील २२४ मतदार संघासाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव यांनाही उमेदवारी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर किरण जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. पण पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयावर काही दुमत नसून पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाने उमेदवारी डावलल्यावर प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारताच लहानपणापासून आरएसएसमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. भारतीय जनता पक्षात हार्डवर्कर म्हणून काम केले आहे. सन २०१३ घरामध्ये जेव्हा पक्षाने मला या मतदारसंघात उमेदवारी दिली होती तेव्हा अन्य एका हिंदुत्ववादी पक्षाच्या उमेदवारामुळे मतांची विभागणी झाल्यामुळे निवडून आलो नाही. पण त्या दिवसापासून सतत कार्यरत राहून सन २०१८ मध्ये संघटना आणि हिंदुत्वाच्या जोरावर या मतदारसंघात भाजपला निवडून आणले. त्याचप्रमाणे या निवडणुकीतही बेळगाव उत्तर आणि ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मजबूत संघटना उभारून पक्षाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील वाटचाल काय या प्रश्नाला उत्तर देताना, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असे ते म्हणाले. तसेच उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षात सुरू असलेल्या बंडखोरीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. गत निवडणुकीत पराभव होऊन देखील काही जणांची पक्षाने मोठ्या पदांवर नियुक्ती केली आहे. अशांनी बंडखोरी करणे हे एक प्रकारे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र धैर्याने काम केलेले आणि मनाने खंबीर असलेले कार्यकर्ते खरोखरच खंबीरपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. पण बंडखोरी करत असलेल्यांना ज्यांनी हे मत दिलेले आहे, त्यांना त्रास होत असणार याचा विचार करून बंडखोरी करणाऱ्यांनी येथे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणे गरजेचे होते असे ते म्हणाले.
आपण इतर पक्षांच्या संपर्कात आहात का असे विचारताच, आमच्या रक्तात आणि कार्यकर्त्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघ याव्यतिरिक्त काहीच नाही हे सर्वांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे इतर पक्षांनी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही आम्ही त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणे हे आमचे कर्तव्य आहे. उमेदवारी न मिळाल्याने एक दोन दिवस रस्त्यावर उतरून गोंधळ माजवून पक्ष आणि पक्षश्रेष्ठींना त्रास देणे योग्य नाही. येथील कार्यकर्ते व जनता ही भाजपच्या पाठीशी आहे. तेव्हा त्यांना पक्षाच्या धोरणापासून दूर येऊ नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
Belgaum Varta Belgaum Varta