
बेळगाव : नुकताच दिनांक 16 मे रोजी राष्ट्रिय डेंग्यू दिवस झाला आणि आता पावसाळ्याला सुरूवात होईल या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्या वतीने येळ्ळूर येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आजार हमखास बळावतात. लोकांमध्ये या आजाराविषयी जागृती हाेण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी प्राथमिक आरोग्य विभाग आणि आशा वर्कर्स यांच्या सहकार्याने हि जनजागृती मोहीम राबविली. डेंग्यू आजाराविषयी सर्वसामान्य लोकांना माहिती देऊन प्रतिरोधक उपाययोजनांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असे यावेळी सतिश पाटील म्हणाले.
एडिस डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसरील स्वच्छता आवश्यक आहे. बऱ्याचदा घरात, गॅरेजमध्ये, कार्यालयात रोज न लागणाऱ्या वस्तू बाहेर उघड्यावर कचऱ्यात फेकल्या जातात किंवा छतावर ठेवल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पावसाचे पाणी साचते व आठवड्यानंतर डासांच्या अळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरुपयोगी सामानाची वेळीच विल्हेवाट लावणे अथवा ते झाकून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचणार नाही. घराच्या छतावर पावसाचे पाणी साचून राहणार नाही, याचीही दक्षता घ्यावी घर, कॉलनी, अपार्टमेंटचा मोकळा परिसर आणि गटारी स्वच्छ ठेवाव्यात. अनावश्यक झुडपे काढावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे कॅन, आदींमध्ये पाणी साचू देण्यात येऊ नये.
‘डेंग्यू’ला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘आपले आरोग्य आपली जबाबदारी’ या व्यक्तीनुसार सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घेण्याची विनंती सतीश पाटील यांनी गावातली नागरिकांना केली. तसेच आशा कार्यकर्त्या या घरोघरी जाऊन जनजागृती करून डेंग्यू रोखण्यासाठी नेमके काय करावे आणि काय करू नये याविषयी माहीत देत आहेत. एकंदरित येळ्ळूर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर आणि आशा कार्यकर्त्या यांच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta