बेळगाव : कंग्राळी बुद्रुकसह परिसरातीत अनेक गावातील कापलेली भातपीके रात्री व आजच्या पावसाने पाण्यात बुडाल्याने शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बी. के. कंग्राळी ग्राम पंचायत सदस्यांनी शिवारात फिरून पाहणी केली असून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
जवळपास गेला महिनाभर या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाचा अधून मधून शिडकाव होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी थोडीशी उघडीप पडल्याने आणि खुप दिवसही झाल्याने अनेक शेतकर्यांनी भात कापणी केली होती पण काल रात्री व आज दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी पडल्याने भात कापलेल्या शिवारात पाणी साचले असून शेतकर्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
परिस्थिती आता हाताबाहेर गेल्याने बीके कंग्राळीतील ग्रा. पं. सदस्यांनी शेतवडीत जाऊन पाहणी केली. तसेच तलाठी व कृषी विभागामार्फत पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन देवून धीर दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, यल्लोजी पाटील, बाबू दोडमणीसह प्रशांत पवार उपस्थित होते.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/12/kangrali-660x330.jpg)