
बेळगाव : भाषावार प्रांतरचना होऊन मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनाला परवानगी देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे. कन्नड संघटनांनी त्याचे स्वागत केले असले तरी यातून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाल्याची भावना मराठी भाषिकांच्या पसरली आहे.
बेळगावात जिल्हा पंचायत सभागृहात आज गुरुवारी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी राज्योत्सवादरम्यान काळादिन साजरा करण्याची संधी नसल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, काळादिन साजरा होऊ देणार नाही. नितेश पाटील यांच्या आदेशाचे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाचे राज्य समन्वयक महादेव तळवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकार सीमेवर कार्यालय सुरू करत आहे. सीमाभागातील कन्नड-मराठी फूट पाडण्याचे काम करत आहे. हे तातडीने शासनाच्या निदर्शनास आणून याला आळा घालावा. काळादिन साजरा करण्याची परवानगी देऊ नका, याबाबत करवे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले आहे.

बैठकीच्या सुरुवातीलाच, महाराष्ट्र सरकारने काल मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत घेतलेल्या बैठकीचा विषय नमूद करण्यात आला. महाराष्ट्र सीमाभाग उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. सगळे मराठीत बोलत असल्याने काय चालले आहे ते कळत नाही. पण कर्नाटकच्या नावाचा उल्लेख ऐकायला मिळतो. सीमेवरील मराठी भाषिकांना एकत्र आणण्याबाबत ते बोलत असल्याचे दिसते अशी चर्चा करण्यात आली, असे उपस्थित कन्नड संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta