बेळगाव : बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी नव्याने सर्व्हे करण्यात यावा, या मागणीसाठी सर्व समाजाच्यावतीने गुरुवार दि. 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्याल्यावर मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णय बिजगर्णी गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महालक्ष्मी यात्रेच्या निमित्याने आज सोमवारी सकाळी बिजगर्णी गावकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत गावचे गायरान आणि ग्रामस्थ कमिटीचा विस्तार यावर चर्चा झाली. गावच्या गायरानामध्ये अनेकांनी तसेच एका बड्या राजकीय व्यक्तीने अतिक्रमण केल्याने या संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन सर्व्हे करण्याची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. याला दलित समाज व ग्रामस्थ कमिटीनेही पाठींबा दर्शवला. त्यानुसार येत्या गुरुवारी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत बोलताना अध्यक्ष वसंत अष्टेकर यांनी गायरानसोबत इतर जमीन अबाधित ठेवण्याची जबाबदारी सगळ्या गावाकऱ्यांची असल्याचे स्पष्ट केले.
परशराम कांबळे यांनी गायरान जमिनीवर दलित समाजाने अतिक्रमण केले नसून दलितांच्या आडून एका राजकीय व्यक्तीने ते अतिक्रमण केल्याचा आरोप केला. यात्रेच्या निमित्याने ग्रामस्थ कमिटीमध्ये चार जागा दलित समाजाला देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याप्रसंगी श्रीरंग भास्कळ, दामू मोरे, विष्णू मोरे, यल्लाप्पा बेळगावकर, बंडू भास्कळ, पुंडलिक जाधव, मारुती जाधव, जकाप्पा मोरे, नारायण चौगुले, जोतिबा मोरे, नारायण भास्कळ, संदीप अष्टेकर, दीपक कांबळे, कल्लाप्पा अष्टेकर, परशराम कांबळे, मारुती कांबळे, संजय कांबळे, पुंडलिक कांबळे, लक्ष्मण कांबळे, प्रकाश भास्कळ आदींसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta