बेळगाव : नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत द्यावी, आर्थिक परिस्थिती संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी विधानसभेत बोलताना दिला.
दुष्काळी परिस्थिती संदर्भात आज विधानसभेत झालेल्या चर्चेप्रसंगी पुढे बोलताना आर. अशोक म्हणाले, पावसा अभावी राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी संकटात आहेत. मात्र सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सरकार दुष्काळाचे गांभीर्य विसरले आहे. सरकार स्वतःच्या चुकांचे खापर केंद्रावर फोडत आहे. राज्यातील जनावरांच्या चारा पाण्याचा विषय गंभीर बनला आहे.शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यातच सरकार दिवसेंदिवस विविध प्रकारचे कर वाढवत आहे. आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात आली होती. या उलट विद्यमान काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात विलंब करत आहे. या सरकारला शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यास काय अडचण उद्भवत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बाबत सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी.
सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करावे. 25 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी. टास्क फोर्स समितीला पाच कोटी रुपये देण्यात यावेत. रयत विद्या निधीतून नव्याने मदत देण्यात यावी. किसान सन्मान योजनेतून राज्य सरकारने शेतकर्यांना 4000 रुपये मदत सुरू द्यावी. प्रत्येक तालुक्यात नव्या कुपनलिका खोदण्यात याव्यात. नवजात शिशु व गरोदर बायकांसाठी आहार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. आहार किट वितरण करण्यात यावे. गोशाळा उघडाव्यात. आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची दक्षता घेत, सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी. अन्यथा, विरोधी पक्ष सरकार विरोधात तीव्र आंदोलन हाती घेईल असा इशाराही आर. अशोक यांनी दिला.