बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित, श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.
सर्व विद्यार्थ्यांनी यशवंत होऊन नावलौकिक वाढवावा पण त्याआधी माणूस बनून जगायला शिका त्याच बरोबर अभ्यासात सातत्य राखले पाहिजे, असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
गेली 14 वर्षे एसएसएलसी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमाला मधील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रतिष्ठित फोटोग्राफर व रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी यशासाठी आत्मविश्वास, इच्छाशक्ती एकाग्रता तसेच व्यायामाची जोड असावी लागते त्यासाठी तुमचा वेळ चांगल्या कार्यासाठी वापरा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेचे सेक्रेटरी सलीम कित्तूर यांनी मोबाईलचा वापर योग्य रीतीने करा अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा. आई-वडील हेच आपले खरे देव आहेत त्यांच्यासाठी अभ्यास करून नावलौकिक वाढवा असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. बी. होसूर सर यांनी केले. याप्रसंगी कारवार कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. चापगावकर, एम डी पाटील, मनोहर होनगेकर, एस. पी. धबाले, बी. बी. कानशिडे, पाखरे सर विविध शाळांचे मुख्याध्यापक व सहशिक्षक उपस्थित होते. चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले.
उद्घाटनानंतर एम जी हायस्कूलचे के. आर. गुरव सर यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाचे सखोल मार्गदर्शन केले या व्याख्यानमालेला विविध शाळांचे सुमारे 300 विद्यार्थी उपस्थित होते.