बेळगाव : बेळगावच्या जनतेचे प्रेम आणि विश्वास आपण कधीच विसरणार नाही, जगदीश शेट्टर यांची शक्ती काय आहे हे बेळगावकरांनी राज्याला दाखवून दिले आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील विकासकामाला लवकरच सुरुवात करणार आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली.
आज बेळगावमध्ये आल्यानंतर आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगावची जनता बेळगावच्या जनतेचे प्रेम आणि विश्वास कधीच विसरणार नाही. १ लाख ७१ हजार मतांची आघाडी घेऊन आपला विजय झाला असून बेळगाव दक्षिणमधून आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी केली. सर्व विधानसभा मतदार संघासह गोकाक आणि अरभावी मधूनही आपल्याला आघाडी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यापूर्वी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना मिळालेल्या पाठिंब्याप्रमाणेच आपल्यालाही पाठिंबा मिळाला, पैशाचे बळ या निवडणुकीत काहीच कमी आले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. उद्या डीसी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देत बेळगाव ते धारवाड थेट रेल्वे प्रकल्प समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला खासदारपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळो किंवा न मिळो, आपण आपली जबाबदारी पार पाडणार आहोत. हुबळीमधील जगदीश शेट्टर आणि बेळगावमधील जगदीश शेट्टर यांच्यात फरक असल्याचेही ते म्हणाले.
स्मार्ट सिटीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजाची पाहणी करेन असे ते म्हणाले. कळसा – भांडुरा प्रकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, म्हादईतून १३ टीएमसी पाणी मिळणार असून याबाबत पर्यावरण विभाग आणि वन्यजीव मंडळाकडून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta