बेळगाव (वार्ता) : ’कोरोनामुळे इच्छा असूनही आपण राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे स्फूर्तिस्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करू शकत नाही पण तरीही त्यांचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच यंदाही आम्ही साधेपणाने या दोन महान व्यक्तींची जयंती साजरी करीत आहोत’ असे विचार मराठा मंदिरचे अध्यक्ष उद्योजक श्री. आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले.
मराठा मंदिर तर्फे बुधवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांची 425 जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची 160 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी चंद्रकांत गुंडकल यांनी प्रास्ताविक केल्यानंतर ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव सैनुचे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी जिजाऊंच्या प्रतिमेचे तर सेक्रेटरी बाळासाहेब काकतकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले. संचालक नारायण नागेश तरळे यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर श्री. गुरव व श्री. काकतकर यांची समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी संचालक शिवाजीराव हंगिरगेकर, नेताजी जाधव, विश्वासराव घोरपडे आदी उपस्थित होते. संचालक नेमिनाथ कंग्राळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी व्यवस्थापक डी. एम. ढोबले, अनिल जांबोटकर व महेश मोरे हेही उपस्थित होते.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/01/maratha-mandir-660x330.jpg)