बेळगाव : “कलियुगात लोक संकुचित वृत्तीने अफवा पसरवितात तशीच अफवा पसरवून द्वापरयुगातही लोकांनी भगवंतांना सोडले नाही.” अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सायंकाळी बोलताना दिली.
इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्ण कथा महोत्सवातील दुसऱ्या दिवशी त्यांनी सतराजित राजा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये स्यमंतक मनीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजाची कथा सादर केली. श्रीमद् भागवतातील दहाव्या स्कंधातील 56 वा अध्याय त्यांनी सादर केला.
“यदुवंशाचा राजा असलेल्या सतराजित राजांना सम्यन्तक मनी मिळाल्यामुळे त्यांनी तो धारण केला आणि त्यामुळे त्यांना दैदीप्यमान प्राप्त झाले. तो मनी राजा उग्रसेन यांना द्यावा अशी सूचना भगवान श्रीकृष्णांनी सतराजित राजांना केली होती. पण त्यांनी ती मान्य केली नाही. त्यांचा भाऊ प्रसेन यांनी तो स्वतःच्या गळ्यात धारण करून जंगलात नेला. तेथे एका सिंहाने प्रसेन व त्याच्या घोड्याचा वध केला. आणि तो मनी पळविला. पण श्रीकृष्णानीच मनी साठी प्रसेनचा वध केला अशी अफवा पसरविण्यात आली. आपल्यावर आलेला हा आळ पुसून टाकण्यासाठी श्रीकृष्णानी गुहेत जाऊन मनी मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांना जांबवान यांच्याशी युद्ध करावे लागले. 28 दिवस चाललेल्या या घनघोर युद्धात शेवटी जांबवान ने माघार घेतली आणि राजा सत्रजीतने केलेला आरोप चुकीचा आहे हे लक्षात घेऊन आपली मुलगी जांबवती व तो मनी भगवान श्रीकृष्ण यांना देऊन त्यांचा विवाह संपन्न केला.
तिकडे या घटनेची माहिती मिळताच आपण भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल खोटी अफवा पसरवून त्यांचा घोर अपराध केला आहे त्याचे प्रायश्चित्त म्हणून सतराजित राजाने आपली मुलगी सत्यभामा ही श्रीकृष्णांना देऊन त्यांचा विवाह केला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा दुसरा आणि तिसरा विवाह झाला . त्यांचा पहिला विवाह रुक्मिणी देवीशी झाला होता.