तारांगण व आयएमएमार्फत कर्करोग जागृती अभियान
बेळगाव : सध्याची दगदगीचे जीवनशैली आणि मानसिक तणाव यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सदृढ शरीरासाठी महिलांनी सकस आहाराचे सेवन, दररोज ध्यान साधना व योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ञ व जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सविता कद्दू यांनी केले.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त तारांगण आयएमएच्यावतीने आयोजित केलेल्या कर्करोग जागृती अभियान कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महिलांमध्ये सध्या स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग यांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात. तंबाखूचे सेवन, धूम्रपान, अतिशय मसालेदार पदार्थाचे सेवन, व्यायामाचा अभाव, आहाराविषयी निष्काळजीपणा हीसुद्धा कर्करोग होण्याची कारणे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारांनी कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो. कर्करोगाची लक्षणे कोणती. ती कशी ओळखावी त्यासाठी स्वतःची तपासणी कशी करावी. याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, जिव्हाळा फाउंडेशन अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, डॉ. अनिता उमदी, डॉ. सुचित्रा पोटे, नेत्रा मेणसे, रोशनी हुंदरे होत्या.
तारांगणाच्या नेत्रा मेणसे, जयश्री दिवटे, सविता चिल्लाळ यांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. स्त्री रोगतज्ञांनी सेल्फ टेस्टिंग व योग प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवले. स्त्री रोगतज्ञांनी महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या शारीरिक तक्रारीबाबत सल्ला व मार्गदर्शन केले. यावेळी महिलांच्या शारीरिक समस्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कर्करोग मुक्त महिलेचा यावेळी सत्कार करण्यात आला. रोशनी हुंदरे यांनी सूत्रसंचालन केले. कर्करोगाची माहिती मिळाल्यामुळे महिलांनी समाधन व्यक्त केले.
कर्करोग अभियान शिबिरामध्ये आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळाले. कर्करोगाबद्दलचे गैर समज दूर झाले. असे समाज जागृतीचे उपक्रम होत आहेत ही समाज उन्नतीसाठी चांगली गोष्ट आहे.