बेळगाव : बंगळूरमधील आरसीबी संघांच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांचा बळी गेलेल्या घटनेला राज्य काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत आज बेळगावात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात हातात फलक घेऊन आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले की, चेंगराचेंगरीत ११ लोकांच्या मृत्यूला राज्य काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. हा काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय, परवानगीशिवाय कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील मतभेदांमुळेच हा अपघात घडला आहे. कोणी मेले तरी सरकारला पर्वा नाही, ते फक्त सत्तेचा उपभोग घेत आहेत. देशाबद्दल लाज आणि आदर असेल, तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, आर.सी.बी. आयपीएल जिंकल्यानंतर फक्त फोटोशूट करण्यासाठी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ११ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. त्यांनी तात्काळ याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक हणमंत कोंगाळी, नगरसेवक राजशेखर ढोणी, उज्ज्वला बडवण्णाचे, विजय कोडगानूर, शिल्पा केंकरे, सदानंद गुंटेप्पन्नवर यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta