Thursday , March 5 2026
Breaking News

शिवरायांचा अवमान झाला आणि चक्क माजी आमदारांचे “बेगडी” पित्त खवळले!

Spread the love

 

नुकताच अथणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते मंत्री संतोष लाड यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद उफाळून आला. मंत्री संतोष लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम समाजाचे सैन्य अधिक होते. त्याचबरोबर अफजल खान वधासाठी वापरण्यात आलेली वाघनखे मुस्लिम समाजाच्या कारागिराने बनविली होती, असे वक्तव्य करून शिवरायांचा अवमान केला व चुकीचा इतिहास सांगितला.

मंत्री संतोष लाड यांच्या या वक्तव्याचा स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवून घेणाऱ्या मराठी भाषिक भाजपचे माजी आमदार अनिल बेनके यांनी येथेच्छ समाचार घेतला. संतोष लाड हे जरी मराठा समाजाचे नेते असले तरी ते काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत म्हणूनच तर माजी आमदारसाहेबांचे पित्त खवळले नसेल ना? असा प्रश्न बेळगावातील स्वाभिमानी मराठी भाषिकांना पडला आहे. कारण जेव्हा बंगळूर येथे शिवरायांचा अवमान झाला आणि त्याचे पडसाद बेळगावात उमटले त्यावेळी हेच तथाकथित मराठी भाषिक आमदारसाहेब कोणत्या बिळात लपून बसले होते. ज्यावेळी बेंगळूर येथे शिवरायांचा अवमान झाला त्या वेळेस आमदार महोदय सत्तेत होते. राज्यात आणि देशात देखील सरकार भाजपचे होते. बेळगावात प्रशासनाकडून वारंवार मराठी भाषिकांची गळचेपी केली जाते. मराठी भाषा मराठी, संस्कृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालविला जात आहे. सरकार भले कोणत्या पक्षाचे असो मराठीची कावीळ ही प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला आहे. परंतु स्वतःला मराठा म्हणून घेणारे मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येऊन सत्ता उपभोगणाऱ्या या तथाकथित मराठी भाषिक व स्वतःला मराठा समजणाऱ्या नेत्यांना तीळ मात्र फरक पडत नाही. आज बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कानडीकरण करण्यासाठी प्रशासनाने मराठी भाषा संपविण्याचा घाट घातला आहे. सरकारी कार्यालय, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सरकारी दवाखाने आदी ठिकाणी मराठी भाषेत असलेले मजकूर पुसून पूर्णपणे कानडी करण्यात आले आहेत इतकेच नव्हे तर बेळगाव शहरातील व्यापारी संकुलावरती असलेले नामफलक देखील पूर्णपणे कानडी करण्यात आले आहेत. नुकताच चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर याच आमदार महोदयांनी स्वतःच्या नावाचा स्वागत फलक मराठी भाषेत लावला होता तर दुसऱ्याच क्षणी कन्नड संघटनांच्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांनी पोलीस संरक्षणात सदर फलक फाडून टाकले तरीदेखील या मराठी भाषिक असलेल्या मराठा समाजाच्या नेत्याचे पित्त खवळले नाही की स्वाभिमान जागा झाला नाही तर त्यांनी गप गुमान दुसऱ्याच क्षणी कन्नड भाषेत स्वागत फलक लावला यावरून लक्षात येते की बेळगावातील मराठा समाजाच्या नेत्यांचा स्वाभिमान तर जागा नाहीच आहे त्या उलट यांच्या पाठीचा कणा देखील पूर्णपणे मोडलेला आहे.

ज्या बेळगावात पावलोपावली मराठा समाजाला आपली भाषा टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्या बेळगावात मराठ्यांच्या समर्थनार्थ अवाक्षर न काढणारे माजी आमदार बेनके अथणी येथे मंत्री संतोष लाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाष्य करतात तेव्हा आमदार साहेबांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला त्या पाठोपाठ बेळगावात देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत अवमानकारक अशा लहान मोठ्या घटना घडल्या, मनगुत्ती आणि हलगा येथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक घटना घडली होती त्यावेळी देखील अवाक्षरही न काढणारे माजी आमदार अनिल बेनके आज मात्र अथणीच्या प्रकरणावर संतापून उठलेले पहावयास मिळत आहेत. ही नेमकी शिवरायांप्रती असलेली श्रद्धा आहे की राजकारणाचा नवा मुद्दा असा प्रश्न बेळगावसह सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांना व मराठा समाजाला पडला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *