
बेळगाव : आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु कर्नाटकात प्रशासन शेतकऱ्यांच्या जणू मुळावरच उठले की काय अशी काहीशी स्थिती पाहावयास मिळत आहे. एकीकडे बायपास आणि रिंग रोड मधून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत तर दुसरीकडे पिकाऊ शिवारातून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या घालण्यासाठी प्रशासन पिकाऊ जमिनीतील रब्बी पिकांचा अक्षरशः फडशा पाडत आहे. रब्बी पिक बेदरकारपणे मोठमोठ्या मशीनच्या खाली चिरडून निघत आहे. बेळगाव येथील शहापूर शिवारात पिकाऊ शिवारातून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या घालण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता किंवा त्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्याची तसूभर देखील कल्पना न देता मागील वर्षी शेतात मोठे खांब उभारणी करत असताना शहापूर शिवारातील पिकांची नासधूस केली होती त्यावेळी शिवारातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला असता याबाबत योग्य ती नुकसान भरपाई देतो असे आश्वासन देखील दिले होते आणि शेतकऱ्यांच्या शेतात मोठमोठाले खांब बसवण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात आले तर यावर्षी देखील रब्बी पिक शेतात असताना पिकाचे नुकसान करत ठेकेदारांनी शेतात विद्युत खांब उभे केले आहेत. वडगाव येथील शहापूर शिवारात बळीराम कुंडेकर या वयस्कर शेतकऱ्याला दमदाटी करून ठेकेदाराने मसूर, मोहरी, हरभरा, वाटाणा आदी पिक अक्षरशः उध्वस्त करून खांब उभारले आहेत आणि सदर शेतकऱ्यास त्याच्या कोणतीच नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. आधीच शेतकरी कधी सुलतानी तर कधी आसमानी संकटातुन जात आहे त्यात प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणामुळे शेतकरी पिचला आहे. वास्तविक पाहता विद्युत खांब शेतात घालण्यासाठी शेतकऱ्याला महिन्याकाठी भाडे मिळत असते असे असताना शेतकऱ्यांना याबाबतची कोणतीच कल्पना न देता कंत्राटदाराने रब्बी पिकातून वाटेल तशी वाहने घालून पिकांची नासधूस करत सदर खांब बसवण्यात आले आहेत. संबंधित खात्याने शेत बांधावर जाऊन कंत्राटदाराचा मनमानी कारभार स्वतः पहावा व पिढीत शेतकऱ्यांना योग्य ते नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी शहापूर शिवार परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta