तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातील
कार्वे या गावावरून घुल्लेवाडी मार्गे कोवाड तळगुळीकडे जात असताना घुल्लेवाडी व निट्टूर दरम्यानच्या ओढ्याला आलेला पूर ओलांडतांना तिघेजण वाहून गेल्याची घटना आज (गुरुवार दि. २२ जुलै रोजी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यातील दोघे जण वाचले आहेत तर एक महिला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली.
यामध्ये सुनिता पांडूरंग कंग्राळकर (रा. तळगुळी) ही महिला वाहून गेली असून सौरभ पांडूरंग कंग्राळकर व यलुबाई तुकाराम कंग्राळकर या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. कोवाड पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेसहा वाजता घुल्लेवाडी गावातील शेतकरी हे निट्टूर घुल्लेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील पुलावरून जात होते. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला असून हा पूल पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ पांडुरंग कंग्राळकर (वय १९) व कल्पना तुकाराम कंग्राळकर (वय ५०) तसेच सुनीता पांडुरंग कंग्राळकर (वय ३८) हे वाहून जात होते. दरम्यान त्यातील सौरभ व कल्पना यांना वाचवण्यात यश आले असून सुनीता हिला अथक प्रयत्न करून सुद्धा वाचवण्यात अपयश आले. सदर तिन्ही व्यक्ती तळगुळी गावचे रहिवासी आहेत. आज पूर्ण दिवस मौजे घुल्लेवाडी गावचे सरपंच युवराज पाटील व सदस्य नारायण गिरी, पोलीस पाटील भागोजी पाटील आणि दक्षता कमिटी ही अशा घटना घडू नये म्हणून बंदोबस्तासाठी थांबलेले होते. या सर्वानी वाहतूक थांबवून वाहतूक बंद असल्याबाबतचे फोटो सुर्यकांत पाटील यांनी प्रसिद्धीसाठी मिडीयाकडे पाठवले होते. तसेच कोवाड पोलिस चौकीचे हेड कॉं. कुशाल शिंदे व अमर सोयकर यांनीही वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही सायंकाळी सहा नंतर या तिघांनी पाण्यातून रस्ता पार करण्याचा निर्णय घेतला आणि ही दुर्दैवी घडली आहे. रात्र झाल्याने शोध थांबविण्यात आला असून उद्या शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. अधिक तपास हेड कॉ. कुशाल शिंदे करत आहेत.
पोलीसांची धावपळ
चार वाजता कडलगे ओढ्यातून एक युवक वाहून गेला. त्याच्या तपासासाठी कडलगेला पोलिस गेले होते. पण लगेच घुल्लेवाडी येथे महिला वाहून गेल्याचा कॉल आला अन पोलिसांना भर पावसात एकच धावपळ करावी लागली. चंदगड तालुक्यात आज दिवसभरात दोघे जण वाहून गेले तर तिघांना वाचवण्यात यश मिळाले.