खानापूर : दुचाकीस्वाराने चुकीच्या विरोधी दिशेने जाऊन कारला ठोकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव शशिकांत यल्लाप्पा मादार (वय 45) असे असून तो हेब्बाळ गावचा रहिवासी आहे.
सदर दुचाकीस्वार आपल्या सीडी डीलक्स दुचाकीवरून हेब्बाळ गावाकडून बेळगावकडे जात असताना करंबळ (गोवा कत्री) बेळगाव -पणजी महामार्गावर असलेल्या ब्रिजच्या डाव्या बाजूनी सर्विस रस्त्याने न जाता उजव्या बाजूच्या सर्विस रस्त्याने चुकीच्या बाजूने जाऊन वरती महामार्गावर अचानक गेला असता बेळगावहून लोंढ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला (क्रमांक केए 20 झेड 6496) जाऊन आढळला. त्यामुळे तो जागीच ठार झाला. तर कार मधील एअर बॅग खुल्या झाल्याने कारमधील लोक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे.
सदर घटना घडली असता कार मधील लोकांनी ॲम्बुलन्सला फोन केला, असता ॲम्बुलन्स दाखल झाली पण काही उपयोग झाला नाही. यावेळी सामाजिक कार्यकर्ते साई ओगले यांनी पोलिसांना याबाबतची बातमी दिली असता खानापूर पोलीस स्थानकाचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले व पंचनामा करून मृतदेह शल्यचिकित्सेसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य चिकीत्सा केंद्रात पाठविला आहे. खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.
खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचे सांत्वन करून धीर दिला व पोलिसांना ताबडतोब पंचनामा करून शल्यचिकित्सेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यास सांगितले व तेथील डॉक्टरांना पोस्टमार्टम करण्याचे आदेश दिले.