युवा म. ए. समितीची मागणी
खानापूर (वार्ता) : बेळगाव – पणजी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. बेळगांवपासून लोंढ्यापर्यंतचा भाग हा मराठी भाषिक भाग म्हणून ओळखला जातो. या भागात 80 टक्के जनता मराठी भाषिक आहे. अशा मराठी जनतेसाठी मराठी भाषेतून फलक उभारावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष धनजंय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दि. 1 रोजी गणेबैलजवळील टोलानाक्यावर करण्यात आली.
सध्या बेळगांव-पणजी महामार्गावर फलक उभारण्यात येत आहेत. हे फलक केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतून असून याभागातील जनतेला कन्नड भाषेचे ज्ञान नाही. या स्थानिक भागातील जनतेला या फलकाची माहिती होत नाही. मराठी भाषेतूनही फलक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर बेळगाव-पणजी महामार्गावर गणेबैलजवळ टोल नाका उभारल्याने स्थानिक भागातील जनतेला टोल नाक्याचा भुर्दंड होऊनये. यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. तेव्हा येत्या काही दिवसात महामार्गावर मराठी भाषेच्या फलकाची सोय झाली नाही तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तसेच मराठी भाषिकांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा संबंधित खात्याला देण्यात आला आहे.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, कृष्णा कुंभार, सिंगीनकोप, म्हात्रू धबाले, रवी पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, दर्शन डिचोलकर, गणेश पाटील, नागेश कांबळे, बबलू मोटर, ऋतीक कुलम, गंगाधर गुरव, विवेक पाटील आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.