खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावच्या शिवारातील विद्युत खांब्याच्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिणगी पडून जवळपास २० ते २५ कर जमिनीतील ऊस शुक्रवारी दि. ४ रोजी जळून खाक झाला.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, करंबळ गावच्या पट्टीतील ऊसाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी विद्युत खांबावरील ताराचे वाऱ्यामुळे एकमेकाचे घर्षण झाले व लागलीच ठिणग्या पडल्या त्यामुळे ऊसाने पेट घेतला. बघताबघता आगीने रुद्र अवतार घेतला. भर दुपारची वेळ असल्याने आगीपुढे कोणीचेही चालले नाही. लागलीच खानापूर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तरीही जवळपास २० ते २५ एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाला.
यामध्ये जवळपास ५०० ते ७००टन ऊस जळल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जळालेला ऊस लैला शुगर फॅक्टरी घेवून जातो व बीलात कोणतीही कपात करणार नाही, असे आश्वासन दिले.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन, हेस्काॅमच्या अभियंता सौ. कल्पना तिरवीर, करंबळ गावचे तलाठी, आदी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ऊसाची पाहणी केली.
या जमिनीतील शेतकरी सुधीर शिवाजी पाटील, परशराम
देवापा पाटील, गावडू मुरारी पाटील, गजानन शिवाजी पाटील, मारूती नागापा पाटील, यादोबा नागापा पाटील, नागेश मल्लू पाटील, नारायण सोणापा पाटील, महादेव गणेश पाटील, केदारी गोविंद पाटील, इरापा पाटील, नारायण मल्लू पाटील, विठ्ठल जुरापा पाटील, निंगापा भरमाणी पाटील, देवापा मष्णू पाटील, अशोक मष्णू पाटील, विजय देवापा पाटील, मारूती रामचंद्र पाटील, राजीव मोतापा पाटील, पुन्हापा कृष्णा पाटील आदी शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.
संबंधित शेतकरी वर्गास नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करंबळ गावासह तालुक्यातील जनतेतून होत आहे. तसेच हेस्काॅम खात्याने शिवारात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची वेळीच व्यवस्था करावी. अन्यथा विद्युत ताराच्या घर्षणाने आगीच्या दुर्घटना होतच राहणार त्यामुळे हेस्काॅम खात्याने याची काळजी घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होताना दिसत आहे.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220205-WA0050-660x330.jpg)