खानापूर (प्रतिनिधी) : परितोषक दवारकरी संप्रदाय समाजातील चातुर्वर्ण्य संस्कार नाकारणारा असून समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे. या संप्रदायांने आजवर समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, भेदभाव, जातीयता, अंधश्रद्धा लाथाडून सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला आहे, असे विचार निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केले. नागुर्डा-वाडा(ता. खानापूर) येथे नुकताच संगीत भजनी स्पर्धा संपन्न झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ग्राम पंचायतीचे अध्यक्ष बाळू बिरजे, वकील अभिजीत सरदेसाई, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगावकर, कृष्णा महाजन, तानाप्पा चापगावकर, टोपाण्णा कालमणकर, परशुराम पाखरे, पुनाप्पा बिरजे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या स्पर्धेत कोल्हापूर येथील पेठ वडगाव संगीत भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. एकूण २२ मंडळांनी यात सहभाग घेतला होता.
पुढे बोलताना सरदेसाई म्हणाले, नागुर्डा-वाडा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय वाढीस लागला ही अभिमानाची बाब आहे. अलीकडे समाजात व्यसनाधीनता वाढत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले याला बळी पडत आहेत मात्र आपला भाग यास अपवाद आहे. अध्यात्म बरोबर आचरण शुद्ध ठेवल्याने शिक्षण आणि उद्योग-धंद्यात इथल्या युवकांनी भरारी मारली असून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. वारकरी संप्रदायाने दाखवलेल्या तत्वांनी वाटचाल केल्यास यशाची सर्व शिखरे आपलीच आहेत. संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाचा अभ्यास केल्यास जीवनाचे सार समजून जाईल त्याकरिता वारी बरोबर संत साहित्याचे वाचन ही करावे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पारवाडकर, माजी जि. पं. सदस्य लक्ष्मण कार्वेकर, संजय कुंभार, नागेश पारवडकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
