खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत, सरकारी कार्यालयावर व बसवर फलक मराठीमध्ये लावावेत या मागणीसाठी 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांचा विराट मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात खानापूर तालुक्यामध्ये जनजागृती करण्यासाठी कापोली या ठिकाणी नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ समिती नेते संभाजी देसाई होते. यावेळी मराठी भाषिकांना मोर्चा संदर्भात माहिती देताना मध्यवर्तीचे सदस्य रणजीत पाटील यांनी पूर्वी मराठी भाषेमध्ये होणारे ठराव ग्रामपंचायतीमध्ये कन्नड भाषेमध्ये करण्याचा अट्टाहास प्रशासनाने सुरू केलेला आहे याची माहिती देऊन मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे हनन करून कशा पद्धतीने मराठी भाषिकांवर कर्नाटकी सरकारचा अन्याय वाढत चालला आहे. या अन्यायाला तोंड देण्यासाठी मराठी भाषिकांनी रस्त्यावरची लढाई लढली पाहिजेत हे सांगितले. तसेच यावेळी तालुका पंचायतचे माजी सभापती सुरेश देसाई बोलताना म्हणाले, मराठी माणसाची एकजूट भक्कम केल्याने मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर होण्यास मदत होईल. यासाठी या मोर्चामध्ये कापोली भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी बोलताना समितीची यापुढील वाटचाल सर्वांना सामावून एकाच विचाराने, ध्येयाने प्रेरित होऊन एकसंघ राहील असे आश्वासन दिले. राजाराम देसाई, राजू पाटील यांचीही मोर्चाच्या जागृती संदर्भात भाषणे झाली. सभा अध्यक्ष संभाजी देसाई यांनी कापोली गावातील मराठी भाषिक कायम समितीच्या झेंड्याखाली एकत्र येतात समितीच्या आंदोलनामध्ये कापोली भागातील मराठी भाषिकांचा भाग हिरारीने असतो यावेळी सुद्धा अशाच मोठ्या संख्येने कापोली गावच्या बरोबर भागातील मराठी भाषिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील असे सांगून या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आणि बैठकीला जमलेल्या कापोली गावातील सर्व नागरिकांच्या हस्ते अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते देवापन्ना गुरव, पी. एच. पाटील, दत्तू कुट्रे, हेमंत देसाई, अमर देसाई, चंद्रकांत देसाई, नागेश मिरजकर, रमेश पुंडलिक पाटील देसाई, विदेश देसाई, अमर जगताप, संतोष देसाई, विनोद देसाई, किशोर देसाई, कल्लाप्पा मिराशी, गणपती गावडे आदी उपस्थित होते.