नवी दिल्ली : मराठीजनांसाठी एक खूशखबर असून लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारनं गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत सध्या आंतर मंत्रालयीन स्तरावर विचारविनिमय सुरु असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं केंद्रानं राज्यसभेत सांगितलं. सातत्यानं महाराष्ट्र सरकारनं यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार आहे.
यासंदर्भात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी राज्यसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. चतुर्वेदी यांनी केंद्राला विचारलं की, महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी आणि स्वतः राज्य सरकारनं वारंवार केंद्रापुढं मांडल्यानतंरही मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का मिळालेला नाही? यावर विचारविनिमय सुरु असल्याचं उत्तर कायम केंद्राकडून देण्यात येतं पण अद्याप ते का झालेल नाही?
चतुर्वेदी यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतीक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी उत्तर देताना सांगितलं की, “लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावर सध्या आंतर मंत्रालयीन विचारविनिमिय सुरु आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय समोर येईल. केंद्राकडून सध्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे”
किती भाषांना अभिजात दर्जा? काय आहेत निकष?
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं नुकतंच सांस्कृतीक मंत्रालयाकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला आहे. देशात सध्या तामिळ, तेलूगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना सध्या अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रानं जे निकष लावले आहेत. त्यानुसार, संबंधित भाषेला १,५०० ते २,००० वर्षांचा नोंदणीकृत इतिहास असावा. प्राचिन काळात संबंधित भाषेतील साहित्याबाबत पुरावे असावेत. तसेच संबंधित भाषेत मूळ साहित्यिक परंपरा असावी ती इतर बोली भाषेतून आलेली नसावी.