मुंबई : शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. आमची घटना जर अवैध असेल तर मग आमचे आमदार अपात्र कसे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वकरांनी निकाल दिला. शिवसेना ही शिंदेची असल्याचं सांगत त्यांनी दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला. शिवसेना कुणाची हे लहान मुलही सांगू शकतं.”
सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले
आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आलं ते आता समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमान असते. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचं दाखवून दिलं. शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या सरकारने लोकशाही पायदळी तुडवली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार तरी बाधित राहतात का हे पाहावं. त्यासाठी सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी.
उबाठा नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा गट म्हणजे उबाठा नाही. उबाठा, उबाठा काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट नाव आहे, आणि उबाठा असेल तर होय, मी उभा ठाकलेला आहे.