नाशिक : निवडणूक आल्याने पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत, हे असलं हिंदुत्व मान्य नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या अधिवेशनाची सांगता गोल्फ मैदानातील जाहीर सभेने झाली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही
सनातन धर्मावर कोणी बोललं की भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे म्हणावे लागेल अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी आहे असा बोचरा वार ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, तुळजाभवानी, श्री कृष्ण यांनी राक्षसचा वध केला तीच वेळ आली आहे. काल आपण राम मंदिर सोहळा बघितला.त्या कार सेवकांना मी वंदन करतो. आता जे मंदिर आहे तिथे प्रणकुटी होती राम तिथे राहिले. शूर्पनखेच नाक इथे कापले. 14 हजार राक्षसाचा वध रामाने केला असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात बाळासाहेब ठाकरे यांची सगळ्यांनाच आठवण झाली. त्यावेळी इतर कोणीही बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घेतली होती. अनेक नेत्यांनी पळपुटी भूमिका घेतली.धर्माची शिकवण देण्याऱ्या शंकराचार्यांना भेटण्याची तसदी नाही. रामनवमी पर्यंत का थांबले नाही, एवढी कसली घाई झाली असा सवाल त्यांनी केला. अटल बिहारी वाजपेयी याना केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा बाळासाहेब मदत केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
निवडणुकांमुळे मोदींना महाराष्ट्र आठवत आहे
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीवरही हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, मोदींचे दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा म्हणून तिकडे गेले नाहीत. इकडे 48 जागा म्हणून येतात. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. तेव्हा राज्य सरकारने मागणी करून ही निधी दिला नाही. पण, गुजरातला न मागताही निधी दिला. हिंदूमध्ये विष पेरतात.भेदभाव करतात. देशासाठी ‘मन की बात’ गुजरातसाठी ‘धन की बात’ करता अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत. मोदी हे योग्य नाही, असलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असेही ठाकरे यांनी म्हटले.
योगीजी आता तुम्ही स्वतःला सांभाळा…
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी मोदींचा विरोधक नाही, मी आजही त्यांना नरेंद्र भाई म्हणतो, त्यांच्याशी सबंध मी आजही लपवत नाही. भाजपची नीती बरोबर नाही. मित्र पक्ष आम्ही बरोबर होतो. पण ती शिवसेना संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले. तुम्हाला विरोधक, नको मित्र पक्ष नको,पक्षातील नेते नको. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग यांना फेकले, देवेंद्र फडणवीस यांना फेकले, मिंधेंना फेकले, योगीजी आता तुम्ही स्वतःला सांभाळा. त्यांना जो जो प्रतिस्पर्धी वाटतो त्याला फेकतात, निवडणूक नंतर असे एखादे प्रकरण काढतील तेव्हा योगींनादेखील फेकतील, असे वक्तव्यही ठाकरे यांनी केला.