
मुंबई : महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील पावसाळी अधिवेशनादरम्यान बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी हे भाष्य केले. आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गणेशोत्सवाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.
आशिष शेलार यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी नमूद केले.
आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “शंभर वर्षांच्या परंपरेला कोणी खंडित केले असेल, तर ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.” असे आशिष शेलारांनी म्हटले
भाजप आमदार हेमंत रासणे यांनीही गणेशोत्सवाच्या महत्त्ववर भर दिला. “गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. रासणे यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करण्याची आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
आशिष शेलार यांनी हेमंत रासणे यांच्या मागणीला दुजोरा देत सांगितले, “महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला. आता आपण महाराष्ट्राचा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव म्हणून जाहीर करू. गणेशोत्सवावर काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले होते, पण आपल्या सरकारने ते दूर केले आहे.” असे आशिष शेलार यांनी म्हटले. या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta