
मुंबई : अखेर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामागील कारण त्यांनी कधी समोर आणले नाही. पण नवीन उमद्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यापूर्वी मांडले होते.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा होती. आपल्याला आता या जबाबदारीतून मुक्त करावे असे त्यांनी यापूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात अनेकदा भावना व्यक्त केली होती. तर नुकताच 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला. त्यावेळी मला पक्षाने आणि शरद पवार यांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालवधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. सर्वांदेखत त्यांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, अशा भावना त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या. आता पुढे जयंत पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात माळ
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव पुढे आले. त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी गेल्यावेळी जयंत पाटील यांनी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta