किनौर : हिमाचल प्रदेशमधील किनौर येथे घाटातील गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 11 जण ठार झाले आहेत. तर 30 जण अजून बेपत्ता आहेत. अनेक गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या दरडीखाली एक ट्रक, सरकारी बस आणि अजून काही वाहने दबली गेली आहेत. शिमल्याच्या दिशेने जात असलेल्या बसमध्ये 40 लोक होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 25 ते 30 लोक दरडीखाली सापडले आहेत. तर 10 लोकांना दरडीखालून बाहेर काढत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बचाव कार्यात अडथळे
दरम्यान, इंडो – तिबेटीयन सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) 200 जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी सांगितले की, आमचे बचाव कार्य रात्रीपर्यंत सुरु राहील. सध्या हा भाग फारच धोकादायक झाला आहे.
एनडीआरएफच्या टीमला केले पाचारण
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, एनडीआरएफ टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एक बस आणि खासगी गाडीवर दरड कोसळली आहे. आम्ही सविस्तर माहितीच्या प्रतिक्षेत आहोत.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ठाकूर यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी सरकारला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या हिमाचल प्रदेश मधील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. तेव्हापासूनच दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/08/333331-660x330.jpg)