Monday , April 20 2026
Breaking News

आषाढातही ’शुभमंगल सावधान’!

Spread the love

कोरोना इफेक्ट : मिळेल त्या मुहूर्तावर उडताहेत बार
निपाणी : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी वेगळे मुहूर्त असणार्‍या आषाढातही सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर वापरून कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नकार्ये होत आहेत.
भौगोलिकदृष्ट्या पूर्वी आषाढ महिन्यात पर्जन्यकाळ असल्याने अंगणात लग्न करणे कठीण होते. तसेच प्रवासाची साधने त्या काळी उपलब्ध नसणे, यामुळे लग्न मुहूर्त दिले जात नव्हते. मात्र आता लग्न मंगल कार्यालयात होत असून शिवाय प्रवासही सुखकर झाला आहे.
त्यामुळे पंचांग कालातील मुहूर्तासह आपत्कालीन कालासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंडितांकडून असे मुहूर्त काढून दिले जात आहेत. सध्या निपाणी तालुक्यात आषाढातही मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मध्यंतरी लॉकडाऊनमुळे अनेक विवाह मुहूर्त हे पुढे ढकलण्यात आले होते. यामुळे आता जी मुहूर्त आहेत, त्या मुहूर्तावर विवाह सोहळे उरकण्यास वधू-वराच्या नातेवाईकांकडून प्राधान्य दिले जात असल्याने आषाढातही विवाह होत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाते पंचागामध्ये गौण मुहूर्त दिलेले आहेत. त्यामुळे आषाढ महिन्याप्रमाणेच पुढील काही महिन्यांमध्येही विवाह सोहळे करता येणार आहेत. या पूर्वी आषाढी एकादशीपर्यंत विवाह सोहळे हे होतच होते. ऐन लग्नसराईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठरलेली बरीच लग्ने या-ना त्या कारणाने पुढे ढकलावी लागली. आता कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे होत असल्याने काही जण घरीच लग्न सोहळे उरकून घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *