पुनर्वापरयोग्य वस्तू, कपडे, पादत्राणांचे संकलन सुरू : शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : केंद्रीय गृह आणि नगर विकास खात्याने सुरु केलेल्या स्वच्छ भारत मिशन शहर अभियानाला निपाणीत नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी पर्यावरण अभियंते स्वानंद तोडकर, विनायक जाधव व मान्यवरांच्या उपस्थित आहेत शनिवारी (ता. २०) प्रारंभ करण्यात आला. या अभियानाला ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. यांतर्गत ५ जूनपर्यंत पुनर्वापरयोग्य वस्तूंचे शहरात बारा ठिकाणी संकलन करण्यात येत आहे.
अभियानांतर्गत प्लास्टिकच्या वस्तू, जुनी पुस्तके, जुने कपडे, पादत्राणे व पुनर्वापर होईल अशा अन्य वस्तूंचे संकलन केले जात आहे. त्यासाठी शहरात १२ ठिकाणी संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांना आरआरआर (रेड्यूस, रीयूज व रिसायकल) असे नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे २० मे ते ५ जून या काळात सुरू राहणार आहेत.
नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी म्हणाले,नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने बैठक घेऊन याबाबतचे नियोजन केले आहे.
वस्तू संकलनाची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर आहे. ५ जूनला होणाऱ्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशभरात मोहीम राबविली जात आहे. एकदा वापर केलेल्या वस्तूंचा पुन्हा वापर करणे शक्य असलेल्या वस्तूंचे संकलन करणे, त्या वस्तूंचे गरजुंना वितरण करणे किंवा त्यापासून टिकाऊ अशी नवी वस्तू तयार करणे हा या अभियानामागचा प्रमुख उद्देश आहे. घरे, संस्था, व्यापारी आस्थापने व अन्य इमारतींमध्ये वापरलेल्या प्लास्टिक वस्तू, कपडे, पादत्राणे, पुस्तके, खेळणी यांचे संकलन केले जात आहे. जमा होणाऱ्या वस्तूचे सहा विभागात वर्गीकरण करून त्यांचे स्वतंत्र संकलन करण्याची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. या मोहिमेत बिगरशासकीय संस्था, महिला बचत गट, रहिवासी संघटनेचे सदस्य स्वयंसेवक यांची मदत घेतली जात आहे.
——————————————————-
इथे सुरू आहे उपक्रम
* बेळगाव नाक्यावरील शिवाजी नगर
* शिवाजी उद्यान ईदगाह माळ
* नगरपालिका कार्यालय
* अशोक नगर मधील रिकामी जागा
* अक्कोळ क्रॉस, पार्वती कॉर्नर
* भंगी चाळ, खरी कॉर्नर
Belgaum Varta Belgaum Varta