
कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी ; जिल्हा पाटबंधारे खात्याला निवेदन
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी (ता.निपणी) येथील कालव्यावरील पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले आहे. वारंवार निवेदन देऊन हे काम करण्याची मागणी केली आहे. पण त्याकडे स्थानिक नेते मंडळी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यासह परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तात्काळ या कामाला प्रारंभ न केल्यास शेतकऱ्यांसमावेत आंदोलन करण्यासह निपाणी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पाटबंधारे खात्याचे अभियंते एस. एस. पट्टणशेट्टी यांना देण्यात आले आहे.
निवेदनातील माहिती अशी, कालव्यावरील पुलाच्या कामासाठी २० दिवसांपूर्वी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी बैठक घेतली. त्यावेळी मार्चनंतर काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. येत्या दहा दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यास शेतकऱ्या समवेत आंदोलन केले जाईल. पुलाच्या कामाचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगून अधिकारी वर्ग शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
पुलामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊसासह इतर पिकांची वाहतूक करणे सोपे होणार आहे. आप्पाचीवाडी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथांच्या दर्शनासाठी विविध राज्यातून येणाऱ्या भाविकासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी किसन नंदी, किसन पोटले, सचीन पटेकर, आनंदा गायकवाड, सर्जेराव हेगडे, सुखदेव मगदुम, प्रवीण बडीगेर, बी. एच. बोते, शिवाजी माने, सुर्याजी पोटले, लक्ष्मण दळवी, प्रदीप माने, अशोक वडे, रावसाहेब कुरणे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta