Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने प्रकाश मरगाळे यांचा सत्कार संपन्न

Spread the love

 

येळ्ळूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची धार अधिक तीव्र करण्यासाठी आणि सीमावासीयांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन श्री चांगळेश्वरी मंदिर येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. प्रकाश मरगाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. विलास ना. घाडी उपस्थित होते. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य रावजी म. पाटील, म. ए. समितीचे नेते श्री. रामकांत दादा कोंडुसकर, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष शांताराम कुगजी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात येळ्ळूर गावचे ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीच्या पूजनाने झाली. त्यानंतर येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष श्री. सतीश बाळकृष्ण पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात येळ्ळूर विभाग नेहमीच सीमा लढ्यात अग्रभागी राहिला असून, इथला प्रत्येक नागरिक महाराष्ट्रात जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध वक्त्यांनी सीमाप्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली, ग्राम पंचायत उपाध्यक्ष
श्री. प्रमोद पुंडलिक पाटील यांनी युवकांना या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष धुळजी यांनी सीमाप्रश्नाचा न्यायालयीन लढा आणि लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याचे महत्त्व विशद केले. कार्याध्यक्ष श्री. भुजंग पाटील यांनी संघटनेच्या मजबूतीवर भर देऊन “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही” असे आपल्या भाषणात सांगितले.

सत्काराला उत्तर देताना श्री. प्रकाश मरगाळे म्हणाले की, “महाराष्ट्र एकीकरण समिती ही केवळ संघटना नसून ती सीमावासीयांची अस्मिता आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता आम्ही सनदशीर मार्गाने आपला लढा सुरूच ठेवू. केंद्र सरकारने सीमावासीयांच्या भावनेचा विचार करून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा” असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. विलास घाडी यांनी सीमाप्रश्नावर सुरू असलेल्या कायदेशीर घडामोडींची माहिती दिली आणि येळ्ळूरच्या जनतेने दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे माजी ग्राम पंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. बी. पी. कानशिडे सर यांनी केले व आभार रामदास धुळजी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *