Saturday , July 27 2024
Breaking News

मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीरपणे बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

Spread the love

मंत्रिपदासाठी दबाव वाढला, मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दौऱ्यावर
बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. विधानसभेचा कार्यकाळ केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने विनाविलंब मंत्रिमंडळ विस्तार व पुनर्रचना करण्याच्या मागणीने जोर घेतला आहे.
बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले की, मला या विषयावर सार्वजनिक चर्चा करायची नाही. मुख्यमंत्र्यांनी ७ फेब्रुवारीला (सोमवार) नवी दिल्ली दौऱ्याचे नियोजन केले आहे.
बोम्मई यांच्या ३४ सदस्यीय मंत्रिमंडळात चार पदे रिक्त आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका होईपर्यंत मंत्रिमंडळाशी संबंधित कोणतीही कसरती संभवत नसली तरी, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या रनअपमध्ये आपल्या मतदारसंघात उपस्थित राहून नवीन मंत्र्यांना छाप पाडण्यासाठी मार्चपर्यंत खूप उशीर होईल, असे भाजपच्या आमदारांचे म्हणणे आहे.
बसनागौडा पाटील यत्नाळ आणि खासदार रेणुकाचार्य यांसारखे आमदार मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची गरज असल्याबद्दल जोरात बोलत आहेत.
तसेच, भाजप आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी बुधवारी पुढील निवडणुकीपूर्वी सरकारला अधिक सक्रिय करण्यासाठी केवळ विस्ताराऐवजी मंत्रिमंडळाचा संपूर्ण फेरबदल करण्याची मागणी केली. पत्रकारांशी बोलताना विश्वनाथ म्हणाले की, काही मंत्री आळशी आहेत, तर काही त्यांच्या मतदारसंघात अडकले आहेत, म्हणून फेरबदल आवश्यक आहे.
ते म्हणाले, मंत्री ना राज्यभर फिरत आहेत, ना त्यांची खाती नीट सांभाळत आहेत. या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले तर बरे. सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राज्याचा विकास सुनिश्चित करण्यासाठी हा बदल आवश्यक आहे, असे विश्वनाथ म्हणाले. मंत्रिमंडळात सक्रिय नेत्यांचा समावेश होईल अशा पद्धतीने फेरबदल केले जावेत, अशी त्यांनी मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री बोम्मई मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी करीत आहेत. फक्षश्रेष्ठी भेटीसाठी वेळ देताच आपण दिल्लीला जाणार असल्याचे खुद्द बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.
त्यातच परिवहन मंत्री श्रीरामलू , बोम्मई यांच्या आधीच दिल्लीला ठाण मांडून बसल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ इच्छुक असलेले श्रीरामुलू काल रात्री दिल्लीत आले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ते भेटतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात मंत्रिमंडळाची पुनर्रचना होत आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रीरामुलू उपमुख्यमंत्रीपदासाठी विनंती करत आहेत. हायकमांडने गेल्या निवडणुकीत त्याना उपमुख्यमंत्री करणार असल्याचे जाहीर केले होते. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
श्रीरामुलू सध्याच्या परिवहन खात्याबाबतही समाधानी नाहीत. दोन दिवसापूर्वीच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बोम्मईंची बंगळूरात भेट घेऊन मंत्रीपदावर दावा केला. आपल्यासह आपले समर्थक आमदार श्रीमंत पाटील व महेश कुमठळ्ळी यांनाही मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या पक्षांतरामुळेच राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्याने आपली मागणी मान्य करावी असा त्यांचा आग्रह आहे.
सध्या बोम्मई मंत्रिमंडळात चार जागा रिक्त आहेत. परंतु डझनभर आमदार मंत्रिपदाासाठी ईच्छुक आहेत. कांही मंत्र्याना मंत्रिमंडळातून वगळून नवीन आमदारांना संधी द्यावी यासाठी पक्षावर दबाव वाढत आहे.
दिल्लीचे ज्येष्ठ नेते सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कर्नाटकचे भाजप प्रभारी अरुण सिंग आणि अमित शहा यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे. परंतु विधानसभा निवडणुक एक वर्षावर येऊन ठेपल्याने इच्छुकांना मंत्रिपदाची घाई लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *