बंगळूर : राज्यातील वक्फ मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची माहिती वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यात एकूण १७,९६९ एकर वक्फ जमिनीवर अतिक्रमण झाले असून त्यातील बहुतांश अतिक्रमणे मुस्लीम समुदायातील लोकांनीच केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तर तासादरम्यान अफजलपूरचे काँग्रेस आमदार एम. वाय. पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री खान म्हणाले की, राज्यात एकूण १,१२,८६० 860 एकर वक्फ मालमत्ता असून त्यापैकी फक्त २०,०५४ एकर जमीन सध्या वक्फ मंडळाच्या ताब्यात आहे.
याशिवाय १७,९६९ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, तर ४७,२६३ एकर जमीन इनाम रद्द कायद्यांतर्गत आणि २३,६२७ एकर जमीन भूमिसुधारणा कायद्यांतर्गत गेल्याची माहिती त्यांनी दिली.
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर व स्वतःकडे खात्याची जबाबदारी आल्यानंतर अतिक्रमणे दूर करण्यासाठी राज्यभर ‘वक्फ अदालती’ आयोजित करण्यात आल्या, असेही मंत्री खान यांनी सांगितले.
वक्फ मालमत्ता ही सरकारने नव्हे, तर खासगी व्यक्ती व संस्थांनी समाजकल्याणासाठी दान दिलेली जमीन आहे, असे सांगताना त्यांनी नमूद केले की वक्फ जमिनीवरील अतिक्रमण प्रामुख्याने मुस्लीम समाजाकडूनच झाले आहे; मंदिर किंवा इतर समुदायांकडून नव्हे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी हस्तक्षेप करत भाजपचा आक्षेप मुस्लीमांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याबाबत नाही, तर शेतकऱ्यांची जमीन, तसेच भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेची जमीन आणि काही मंदिरांची जमीन वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केला जात असल्याबाबत आहे, असे स्पष्ट केले.
भाजपने वक्फ मालमत्तांवरील अतिक्रमणांची चौकशी करण्यास पाठिंबा दिला आहे, असेही अशोक यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री खान यांनी सरकार कोणत्याही मंदिर किंवा शैक्षणिक संस्थांची जमीन वक्फ मालमत्ता म्हणून जप्त करत नाही, असे स्पष्ट केले. अतिक्रमणे ओळखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठीच वक्फ अदालती आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta