नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बेळगावातील विधिमंडळाचे अधिवेशन नियोजनाप्रमाणे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर महसूल मंत्री आर. अशोक यांनी सरकारची तयारी आणि नवीन नियमावलीची माहिती दिली.
राज्यातील दुसर्या लाटेसाठी सज्ज असलेल्या कोविड बेड व आयसीयू बेडची पुनर्बांधणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बोम्माई यांनी आरोग्य विभागाला ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात पुन्हा नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचार्यांचे नियोजन करण्यासाठी पावले उचलली जातील. अत्यावश्यक औषधे अगोदरच खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिल्पा नागराज यांची राज्यातील कोविडच्या प्रभारी निरिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड चाचणीचा दर 500 रुपये निश्चित करण्यात आला. अबेट चाचणी 3 हजार रुपये करण्यात आली आहे. विमानतळावरही कोविड चाचणी काटेकोरपणे केली जाईल. निगेटिव्ह रिपोर्टनंतर विमानतळाबाहेर पाठवण्यात येईल. सर्वाना मास्क वापरण्याची सक्ती असून नियमाचे उल्लंघन करणार्यांना बंगळूर महापालिका क्षेत्रात 250 रुपये व इतरत्र 100 रुपये दंड आकारण्यात येईल.
मेट्रो रेल्वे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजारपेठ, खेळाची मैदाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फिरणार्यांना लशीचे दोन डोस अनिवार्य आहेत.
अधिवेशन बेळगावातच
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजनाप्रमाणे बेळगावातील सुवर्ण विधानसौधमध्येच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री अशोक म्हणाले. राज्यातील ओमिक्रॉनच्या भीतीच्या पार्श्वभुमीवर विधानसौधचे कर्मचारी व अन्य कांही जणांनी बेळगावात अधिवेशन घेण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे अधिवेशनाविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती. परंतु बैठकीत अधिवेशन बेळगावातच घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यामुळे आता नियोजनाप्रमाणे 13 ते 24 डिसेंबरपर्यत बेळगावातच अधिवेशन होणार हे निश्चित आहे.
कांही प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे अशी –
* शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभावर बंदी.
* सिनेमा हॉल, मॉल, शाळेतील कर्मचारी, मुले आणि त्यांच्या पालकांना लशीचे दोन डोस अनिवार्य.
* विवाह समारंभ 500 लोकांची मर्यादा.
* रोज 1 लाख कोविड चाचणी करण्याच्या सूचना.
* सरकारी कर्मचार्यांसाठी दोन डोस कोविड लस अनिवार्य.
* मास्कची सक्ती कायम.
* केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील भागात चेक पोस्ट.
तज्ञानी सूचविलेले उपाय
कर्नाटकाला लागून असलेल्या केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात अधिक तपासण्या केल्या पाहिजेत. तांत्रिक सल्लागार समितीने मुख्यमंत्र्यांना दोन डोस लस उपलब्ध नसल्यास राज्यात प्रवेश रोखण्याचे आवाहन केले आहे.
चामराजनगर जिल्ह्यातील कोळेगाल, गुंडलुपेठ, म्हैसूर, बेळगाव, गुलबर्गा, बिदर, रायचूर, बेळ्ळारी, कोलार, चिक्कबळ्ळापूर आदी ठिकाणी आंध्र प्रदेश, तेलंगणा व अन्य राज्यांतून येणार्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाकरण्यात आल्या आहेत.
सभा, धार्मिक समारंभ, जत्रा, विवाह, राजकीय कार्यक्रम इत्यादींसह इतर कार्यक्रम पूर्णपणे बंद करावेत. पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या वेळी जे धोरण अवलंबले होते, तीच रणनीती सरकारने अवलंबावी, जेणेकरून जास्त गर्दी होऊ नये, असा सल्ला दिला आहे.
राज्यात 45 लाखांहून अधिक लोकांना दुसरी लस मिळालेली नाही. त्यांना लस देणे बंधनकारक असले तरी द्यायला हवे. तज्ञांचे म्हणणे आहे की सरकारने दररोज चाचणी आणि लसीकरण दर वाढविण्याबद्दल आणि कोविड वॉरियर्सना बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे.
ओमिक्रॉनबद्दल लोकांना विनाकारण घाबरवण्याऐवजी जागृती करण्यासाठी संघ, संस्थांची मदत घ्यावी. तज्ञांचे म्हणणे आहे की ते विमानतळावर 24 तास काम करणार्या तज्ञ डॉक्टरांच्या तैनातीसह अनेक सावधगिरीचे उपाय करण्याची सूचना तज्ञांनी केली आहे.