मुंबई : खासदार शरद पवार यांनी काल दिल्लीतील घरी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली. तिसऱ्या आघाडीबाबत ही बैठक असल्याची चर्चा होती. यातून शिवसेनेला वगळण्यात आल होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या होत्या. आज प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे, देशासह राज्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
”मा. श्री. शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री. पवार म्हणाले.” असे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मागिल काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. मात्र आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघालं आहे.