चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोना आणि महापुराच्या काळापासून चंदगडचे तहसिलदार ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या या भागात स्थानिक अधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याचे दिसून येते. चंदगड तालुक्याचे तहसिलदार विनोद रणवरे यांचा मोबाईल नंबर सतत ‘नॉट रिचेबल’ असतो. तहसीलदार रणवरे हे फक्त आमदार, खासदार अथवा मंत्री आले असतील तरच रिचेबल असतात. एरव्ही मात्र सर्व सामान्य जनतेसाठी ते ‘नॉट रिचेबल’ असतात. त्यांचे फक्त whatsapp चालू असते. याशिवाय, चंदगड तहसिलदार कार्यालयातील दूरध्वनी सुद्धा बंद असल्याने तालुक्याच्या अनेक लांबच्या गावातून फोन करून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
चंदगडचे तहसिलदार हे स्वत:च्या कार्यालयात सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे लांबून भेटायला येणाऱ्या अभ्यंगतांची गैरसोय होत आहे. एकीकडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जनतेच्या सेवेसाठी आपल्या कार्यालयाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. तर दुसरीकडे मात्र चंदगडसारख्या दुर्गम भागांतील तहसिलदार यांच्यासह अनेक स्थानिक अधिकारी मात्र लोकांना भेटत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येते. जिल्हाधिकारी सतत ‘रिचेबल’ तर चंदगडचे तहसिलदार सतत ‘नॉट रिचेबल’ असल्याचे दिसून येते. याबाबत चंदगड युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदीप नांदवडेकर यांनी खंत व्यक्त केली आहे.