बेळगाव : मच्छे भागात अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांनी आज सकाळी रास्तारोको केला. खानापूरहूनन निघालेल्या बसेस या फुल असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. परिणामी या भागातील विद्यार्थ्यांना तासंतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्यांनी मच्छे नेहरूनगर येथे रास्ता रोको करून बसचा निषेध व्यक्त केला.
खानापूरमधील नोकरदार वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या भागातून सकाळच्या सत्रात फक्त एकच बस असल्याने खानापूर मध्येच बससाठी गर्दी होत आहे. परिणामी पुढील स्थानकावर विद्यार्थ्यांना बसमध्ये थांबण्यास जागा उपलब्ध नसल्याने त्यांना शाळा-कॉलेजमध्ये वेळेवर पोहचण्यास समस्या येत आहे. तसेच शिक्षकही दोन तास विद्यार्थी वर्गात उशिरा येत असल्याने पालकांना फोन करून धारेवर धरत आहेत.
मच्छे नेहरूनगर येथे बस दररोज थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या समस्येला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य रामलिंग पाटील आणि गणपत पाटील यांनी परिवहन मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. तरी देखील या भागात जादा बसेस सोडण्यात न आल्याने असे अद्यापही जैसे थे आहे. त्यामुळे झाडशहापूर किंवा देसुरपासून सकाळी आणि संध्याकाळी ज्यादा बसेस सोडवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.